शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

जळगाव,(प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व अडचणींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा गट)च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले सरसकट कर्जमाफीचे आश्वासन पाळावे, तसेच ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट ३ हजार क्विंटलवरून १० हजार क्विंटलपर्यंत वाढवावे, अशा महत्त्वपूर्ण मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.

शासनाकडून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून थकीत लाभ मिळालेला नाही, तो त्वरित वितरित करावा, तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

या निवेदनावेळी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप भोळे, जिल्हा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, नेत्या वैशाली सूर्यवंशी, तालुका प्रमुख उमेश पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, समन्वयक संतोष पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख जाकिर पठाण, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, प्रमोद घुगे, किरण भावसार, विजय बांदल, शोएब खाटीक, कलीम खान, शरीफ रंगरेज, सचिन चौधरी, विजय राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.