विठुरायाच्या दर्शनासाठी आला, पण काळाने हिरावला, चंद्रभागेत उतरलेल्या बेळगावातील तरुणासोबत पंढरपुरात अनर्थ.

विठुरायाच्या दर्शनासाठी आला, पण काळाने हिरावला, चंद्रभागेत उतरलेल्या बेळगावातील तरुणासोबत पंढरपुरात अनर्थ.

 

 पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या तरुणाचा चंद्रभागेत दुर्दैवी मृत्यू झाला. नदीपात्राजवळ अग्निशमन दलाचे कर्मचारी असूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. आमदारानेही या घटनेवर नाराजी व्यक्त करत आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पंढरपूर येथे दर्शनासाठी आलेल्या तरुण भाविकाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे शुभम ज्ञानेश्वर पावले (वय २७, रा. अलतगे, बेळगाव) या तरुण भाविकाचा चंद्रभागेत बुडून मृत्यू झाला आहे. चंद्रभागा नदीपात्राजवळ उभे असलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची खंत त्या तरुणाच्या भावाने व्यक्त केली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी देखील आपत्ती व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त करत थेट जिल्हाधिकारी यांना फोन केला होता.

बेळगाव येथील शुभम पावले, वैजनाथ पावले, हेमंत चौगुले, गजानन जाधव, भरत पाटील, हनुमंत मगनाईक, अमित पवार हे सर्वजण मिळून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते.गाडी पार्किंग करुन चंद्रभागेकडे आले. शुभम पावले हा पुंडलिक मंदिराकडे गेला. इतर सहा जण स्वच्छतागृहाकडे गेले. चंद्रभागा नदीपात्राजवळ असणाऱ्या पुंडलिक मंदिराजवळ शुभम पावले याने नदी पात्रात उडी मारली.शुभमला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. चार तासांच्या शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह सापडला. आदिवासी महादेव कोळी समाजातील युवक विठ्ठल अधटराव, उत्तर परचंडे, ओंकार संगीतराव, सचिन कोळी यांनी त्याचा मृतदेह शोधून पोलिसांच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक अॅक्टिव्ह नसून याकडे आपण लक्ष द्यावं. आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच आदिवासी महादेव कोळी समाजातील युवक चांगल्या पद्धतीने पोहतात. त्यांची रेस्क्यू टीममध्ये कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना केल्या आहेत.दरम्यान, विठुरायाच्या दर्शनसाठी आलेल्या तरुणाचा चंद्रभागेत अशाप्रकारे मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांकडूनही तरुणाच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.