कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू ; यावल शहरातील घटना

यावल प्रतिनिधी | यावल शहरातील बुरुज चौकाजवळ शुक्रवारी (२७ जून) सायंकाळी कंटेनरच्या धडकेत एक ५८ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान रात्री जळगाव येथे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील आठवडे बाजारातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
प्राप्त माहितीनुसार, यावलमधून जाणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातगाड्या आणि दुकाने उभारल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि कायमस्वरूपी कोंडीची परिस्थिती निर्माण होते.
शुक्रवारी सायंकाळी चुंचाळे येथील रहिवासी कस्तुरबा चैत्राम सावकारे (वय ५८) या बाजारात जात असताना बुरुज चौकात आर.जे. ०९ जी.डी. ४९७० क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनर त्यांच्या डाव्या पायावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कंटेनर चालक आबिद खान नवाब याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सांगितले की, बाजारपेठेतील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो असून लवकरच अतिक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
दरम्यान, कस्तुरबा सावकारे यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी चुंचाळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.