जळगाव – प्रतिनिधी । किरकोळ कारणावरुन शहरातील रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्र चौकात दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना काल रात्री घडली आहे.

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून दोन गटात धूसफूस सुरु होती. दरम्यान, परिसरातील काही तरुण हे स्वामी समर्थ चौकात असलेल्या अपार्टमेंटजवळ उभे होते. यावेळी दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांनी तेथे उभ्या असलेल्या तरुणांवर अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होवून पळापळ झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्रीच्यावेळी या परिसरात गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येताच दगडफेक करणाऱ्या संशयित तेथून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने वातावरण निवळले.
दरम्यान, या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ चौकातल्या एका मेडिकल स्टोअरवरून मुलाला काढून टाकल्याने वाद झाला. यातून दोन गटांमध्ये किरकोळ दगडफेक झाली. एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतल्याने तरूण पळून गेले असून त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. कुणीही या प्रकरणी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील संदीप गावित यांनी केले आहे.