मित्रांच्या भांडणाचा राग मनात ठेवून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

जळगाव : शहरातील तांबापुरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, मित्रांमधील भांडणाचा राग मनात ठेवून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. रविंद्र विक्रम हटकर (वय ३५, रा. गवळीवाडा, अपतांबापुरा) हे २५ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हनुमान मंदिराजवळून घरी जात असताना त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी आकाश प्रकाश चव्हाण (रा. तांबापुरा) याच्याविरुद्ध कारवाई सुरू असून, तो फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश चव्हाण याचे २४ मे रोजी रविंद्र हटकर याच्या मित्राशी काहीसा वाद झाला होता. त्याच वादातून आकाशने दुसऱ्या दिवशी रविंद्रवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन पाटील करीत आहेत. या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.