10 kg of wheat and rice to flood-affected families in the state: Information from Chhagan Bhujbal मुंबई (24 सप्टेंबर 2025) : राज्यातील पूरग्रस्त बाधीत प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत दोन हजार 654 कुटुंबांना मदत केली आहे. साडे सव्वीस मेट्रिक टन गहू तांदूळ दिला आहे, आमच्या विभागाकडून अन्नधान्य पुरवठा केला जातो आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

बाधीत कुटूंबाला 10 किलो गहू-तांदुळ
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा देखील पुराच्या विळख्यात अडकला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच शेतांमध्ये पुराचे पाणी गेल्याने पिकांची नासाडी झाली असून शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशात आता सरकारने पुढाकार घेतला असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विभागाकडून बाधित कुटुंबाला धान्य वितरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
केंद्राची मदत शंभर टक्के येणार
संकट एवढे मोठे आहे की, मदतीची वाट न बघता बाधीत लोकांना मदत करायला सरकार पुढे येईल. केंद्राची मदत शंभर टक्के येईल, पंचनामा झाल्यानंतर किती मदत द्यावी हे स्पष्ट होईल, असेही भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ म्हणाले, पहिल्या टप्प्यात मदत केली आहे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. असा पाऊस यापूर्वी आम्ही बघितला नाही, असे अनेक लोक म्हणत आहेत. ढगफुटी अनेक ठिकाणी होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम दिसून येत आहेत. पाऊस पडत नाही तर कोसळतोय त्यामुळे टाऊन प्लॅनिंग करताना विचार व्हायला हवा, असे भुजबळ म्हणाले.
मंत्री, खासदार व आमदार आपला एक महिन्याचा पगार देणार
सरकारकडून बाधित कुटुंबांना मदत तर मिळणार आहेच, पण त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार, खासदार व मंत्र्यांकडून मदत केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानुसार पक्षातील सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधान परिषदेचे आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.