वादळी वाऱ्याने जळगाव जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था कोलमडली ; महावितरण कडून युद्धपातळीवर कार्य सुरू

वादळी वाऱ्याने जळगाव जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था कोलमडली ; महावितरण कडून युद्धपातळीवर कार्य सुरू

जळगाव (प्रतिनिधी) – बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने जळगाव जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था कोलमडली असून महावितरणच्या अधोसंरचनेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून महावितरणकडून तातडीने दुरुस्तीचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

वादळामुळे जिल्ह्यातील एकूण १५ उपकेंद्रांमधील वीज सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती. यापैकी ५ उपकेंद्रांची सेवा पुन्हा सुरळीत करण्यात यश आले असून उर्वरित १० उपकेंद्रांचे काम दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर महावितरणच्या विविध विभागातील कर्मचारी आणि तांत्रिक पथके सलग दिवसरात्र कार्यरत आहेत. वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि आवश्यक साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले असून अन्य भागांतूनही अतिरिक्त कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

महावितरणने नागरिकांना सहकार्याचे आवाहन करत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तुटलेल्या वीजवाहिनीजवळ जाणे टाळावे, सुरक्षित अंतर राखावे आणि अशा प्रकारची माहिती तातडीने स्थानिक कार्यालयाला कळवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या सुरक्षेस सर्वाधिक प्राधान्य दिले जात असून वीज सेवा पूर्ववत करताना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यात येणार नाही. वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी यंत्रणा सतर्क असून, कार्य जलदगतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे.